वसई : गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या श्रध्दा वालकर या मुलीच्या झालेल्या निर्घृण खुनाची घटना अत्यंत वाईट आणि निंदनीय आहे. आज या मुलीच्या वडिलांना भेटले असता त्यांनी याबाबत काही माहिती दिली. त्यांच्याशी बोलले असता त्यांनी या मध्ये ही मुलगी गेल्या काही दिवसापासून या मुलाच्या संपर्कात होती. मात्र तिचा अलीकडच्या काळात कुटुंबीयांसोबत संवाद मात्र कमी झाला होता.
स्वेच्छेने तिने या मुलासोबत राहण्याचा घेतलेला निर्णय आज तिच्या जिवावर बेतला. हे पाहता आज राज्यातील सर्व स्तरातील कुटुंबे आणि पालकांनी याबाबत अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या कुटुंबात विशेषतः मुलांशी नियमित संवाद असणे अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.
आज त्या वसई परिसरातील या मुलीच्या घरी तिच्या पालकांची भेट घेतली. त्या आधी त्यांनी माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी पुढील मागण्या केल्या :
१. या घटनेतील आरोपीवर लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावे.
२. सदर प्रकरणाचा निकाल येत्या सहा महिन्यात लावून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जावी.
त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या घटनामध्ये मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो. हे पाहता अशा बाबींचा पालकांनी विचार करणे आवश्यक आहे. काही समस्या असतील तर याबाबत कौटुंबिक समुपदेशन महत्त्वाचे आहे. या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा तपास अतिशय कार्यक्षमपणे केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
यावेळी शिवसेना पदाधिकारी जिल्हा संघटीका किरण चेंदवणकर, माझी शहर प्रमुख उदय चेंदवणकर तालुका संघटक प्रभा सुर्वे, शहर संघटक जसिंथा फिंच, श्रद्धा जाधव, उपशहर संघटक रुचिता विश्वासराव, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, उप तालुकाप्रमुख सुनील मुळे, शहर प्रमुख संजय गुरव, विभाग संघटक प्रियांका निकम, उपशहर प्रमुख शाशिभूषण शर्मा, सूरज शिरोडकर, तालुका प्रमुख स्वप्नील बांदेकर आणि सहायक पोलिस अधिक्षक प्राजक्ता बडे, पोलिस निरीक्षक संपतराव पाटील, तपास अधिकारी सचिन सानप आदी उपस्थित होते.