सोलापूर : सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्याकांडामध्ये एका चार वर्षाच्या चिमूरड्याचा देखील अंत झाला असता. पण सुदैवानं त्यानं प्रसंगावधान राखून घराचे दार बंद करून घेतले. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.
नक्की काय घडले ?
रुद्र याची आई दिपाली माळी या घराच्या अंगणामध्ये दुपारच्या सुमारास कपडे धुवत असताना शेजारच्या वस्तीवर राहणाऱ्या समाधान लोहार याने तिच्यावर दगडाने हल्ला केला. दिपाली माळी यांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु समाधान लोहार यानी तिची निर्दयपणे हत्या केली. तिचा आवाज ऐकून तिच्या आते सासू बाहेर आल्या, त्यांच्यावर देखील लोहार याने फावड्याने प्रहार करून त्यांची ही हत्या केली.
हे सर्व पाहून त्यांची दुसरी आत्या घराच्या मागच्या बाजूला पळू लागल्या. यावेळी लोहार याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर देखील दगडाने प्रहार करून हत्या केली. यामध्ये दिपाली माळी वय वर्ष 21, पारूबाई माळी वय वर्ष साठ, आणि संगीता माळी वय वर्ष 55 यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे.
यावेळी दिपाली माळी यांचे पती बाळू माळी हे त्यांच्या आईला घेऊन दवाखान्यात गेले होते. ते परत आल्यानंतर घरातले हे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पत्नी आणि दोन्हीही आत्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी मुलाला शोधण्यासाठी जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली. भेदरलेल्या रुद्र ने सुरुवातीला आवाज दिला नाही. परंतु वडिलांचा आवाज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने दरवाजा उघडला आणि वडिलांकडे जाऊन टाहो फोडला. घरात काय घडले हे सर्व रुद्रने सांगितले. चार वर्षाच्या रुद्रन प्रसंगावधान राखले आणि वडील येईपर्यंत दार उघडले नाही. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.