अंगारकी चतुर्थी : मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला होता की तुझे नाव “अंगारक” हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा होता. या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय, असे मानले जाते.
या दिवशी सायंकाळी ११, २१ किंवा आपल्या इच्छेप्रमाणे गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे . घरात आपला आवाज सर्वांच्या कानावर पडेल अशा ठिकाणी आसनावर बसून हे पाठ करावे . यामुळे घराव येणारे विघ्न अवश्य दूर होतील.
गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केले. या मूर्तीला ‘मंगलमूर्ती” असे नाव मिळाले.
गणपती या देवतेशी संबंधित हे व्रत आहे. या व्रतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री भोजन करतात. भोजनात समाविष्ट असलेल्या उकडीच्या मोदकांचा गणपतीला नैवेद्य दाखवतात. यावेळी श्रीगणेशाची पूजाही करतात. भक्त घरोघरी गणेशाची पूजा करतात. या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन लोक देवाचे दर्शन घेतात. अंगारकी चतुर्थी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.