नवी दिल्ली : न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी आज देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सरन्यायाधीश उदय लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. उदय लळीत यांनी सरन्यायाधीश म्हणून 74 दिवस काम केले. गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात यांना निरोप देण्यात आला. त्यानंतर बुधवारी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे.
न्या.डी.वाय.चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून 13 मे 2016 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. ‘न्यायपालिका याचिका कर्त्यांसाठी न्याय मिळवण्याचे चांगले ठिकाण बनेल यासाठी काम करणार’ असल्याचं यावेळी न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे. तसेच ‘देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे देशाचे सोळावे सरन्यायाधीश होते. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत ते सरन्यायाधीश होते. त्यामुळे 37 वर्षानंतर धनंजय चंद्रचूड हे पुन्हा त्याच खुर्चीवर विराजमान होणार आहेत.