रांची- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
139 कोटी रुपयांच्या दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशि यांनी 41 जणांना दोषी ठरवून 21 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील सुनावणी निश्चित केली होती. लालू प्रसाद यादव यांच्यासह 38 दोषींच्या शिक्षेवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावण्यात आली. आज यापैकी 38 जणांना शिक्षा सुनावण्यात आली अन्य तीन दोषी 15 फेब्रुवारीला न्यायालयात हजर झाले नाहीत. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण ?
1990 ते 1995 साली दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठं प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. दोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे.