झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकूट टेकडीवर रविवारी रोपवे दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. झारखंडच्या सर्वात उंच रोपवेवर झालेल्या अपघातात सुमारे 18 वेगवेगळ्या ट्रॉलींमध्ये 48 लोक अजूनही अडकले आहेत. एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य करत आहे. लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे, मात्र अद्यापपर्यंत लोकांना सुखरूप परत आणण्यात यश आलेले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रोपवेवरील किमान 12 केबिनमध्ये 50 लोक अजूनही अडकले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातानंतर सुमारे 20 तास उलटले तरी 48 हून अधिक लोक अजूनही हवेत लटकले आहेत. या लोकांना वाचवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचताच हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे ट्रॉली हलू लागली आहे आणि ती यातील लोकांच्या जीवावर येत आहे. वर अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी दिले जात आहे. ट्रॉलीमध्ये लहान मुले, पुरुष आणि काही महिला अडकल्या आहेत. यासोबतच गाईड आणि छायाचित्रकारही अडकून पडले आहेत.
रोपवे चालवणारी एजन्सी ब्लॅक लिस्टमध्ये
झारखंडमधील देवघर येथे रामनवमीनिमित्त त्रिकूट पर्वतावर भटकंती करण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. त्यावेळी काही केबल कार एकमेकांना धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी येथे 2 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. केबिन जमिनीपासून सुमारे 2500 फूट उंचीवर आहे. त्यामुळे कारवाई सुरू करण्यापूर्वी सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात आहे. झारखंडचे पर्यटन मंत्री हफिझुल हसन यांनी सांगितले की, रोपवेचे संचालन करणाऱ्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनला काळ्या यादीत टाकले जाईल.
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली ?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली, ज्यामुळे केबल कारची टक्कर झाली. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. ते म्हणाले की, स्थानिक लोकही एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत.