दिवाळीमध्ये अनेक महिलांना सर्वात जास्त अवघड वाटणारा फराळाचा पदार्थ म्हणजे चकली अनेक जणींची तक्रार असते की आमची चकली ही खूप सहज आणि लवकर मऊ पडते. त्यामुळे आज मी तुम्हाला अगदी पहिल्या पासून म्हणजेच चकलीची भाजणी बनवण्याचे पदार्थ आणि त्याचे प्रमाण कसे असावे तांदूळ कोणता घ्यावा हे सर्व काही सांगणार आहे चला तर मग पाहूयात चकलीची भाजणी बनवण्यासाठी पदार्थांचे योग्य प्रमाण
साहित्य : एक किलो चकली बनवण्यासाठी हे प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे. अर्धा किलो तांदूळ हा तांदूळ, (रेशनचा घेतला तर खूप चांगले विशेष करून इंद्रायणी तांदूळ घेऊ नका तो तांदूळ चिकट असतो.) , 200 ग्रॅम हरभरा डाळ, 100 ग्रॅम जाड पोहे, 25 ग्रॅम धने, 25 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम उडीद डाळ,100 ग्रॅम मूग डाळ आणि 100 ग्रॅम साबुदाणा
आता यामधील कोणते धान्य हे धुवून घ्यायचे आहे हे आपण पाहूयात, तर यामध्ये तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ हे चार धान्य आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. हे धान्य केवळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे भिजत ठेवायचे नाही. धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर यांना स्वच्छ उपसून घेऊन वाळत घाला. हे सर्व धान्य केवळ पंख्याखाली दोन ते अडीच तासासाठी वाळवून घ्यायचे आहे. उन्हामध्ये वाळवायचे नाही. दोन ते अडीच तासानंतर हे सर्व जिन्नस एका बाऊलमध्ये वेगवेगळे व्यवस्थित काढून घ्या.
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणता जिन्नस केव्हा भाजायचा अर्थात या सर्व पदार्थांचा क्रम पाहूयात
तर सर्वात प्रथम कढई तापल्यानंतर त्यामध्ये जिरे 25 ग्रॅम भाजून घ्यायचे आहेत. गॅस मिडीयम आचेवर ठेवा . दीड दोन मिनिटांमध्ये जिरे छान भाजून होतील. थोडे फुलले आणि वास सुटला की लगेच जिरं काढून घ्या. त्यानंतर यामध्ये धने घालावेत. धने देखील एक ते दोन मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या.
त्यानंतर साबुदाणा तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घ्यावा.त्यानंतर तीनही डाळी तुम्हाला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. डाळी भाजताना थोड जास्त वेळ लागेल. कारण डाळी पाणी शोषून घेतात. त्यामुळे त्या व्यवस्थित कडकडीत भाजल्यानंतर त्यांना वेगळे करून घ्या. आणि सर्वात शेवटी तांदूळ घाला. तांदूळही व्यवस्थित कोरडे खमंग भाजून घ्या.
आता हे जिन्नस जेव्हा तुम्ही एक एक करून भाजून घेऊन बाजूला काढत आहात त्यावेळी ते ताटात काढू नका. ताटावर प्रथम एखादी कॉटनची ओढणी घ्या. आणि मग हे जिन्नस एकेक करून त्यामध्ये घालावेत. आता हे सर्व जिन्नस योग्य प्रमाणात छान तयार आहेत. आपण जे मेजरमेंट या सर्व जिन्नस एकत्र करून घेतले आहे ते एक किलो पर्यंत जाते. आता हे गिरणीतून अगदी बारीक दळून आणावेत. या प्रमाणामध्ये भाजणीचे पीठ बनवल्यानंतर चकली छान खुसखुशीत पोकळ आणि काटेरी होईल.