पहिली थाप (पं. हृदयनाथ मंगेशकर) : ‘… सागरा प्राण तळमळला’ या गाण्याला चाल लावली म्हणून आपली आकाशवाणीची नोकरी गेली
दुसरी थाप (पंतप्रधान नरेंद्र मोदी) : काँग्रेसनं, लता मंगेशकर यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता ऑल इंडिया रेडिओवर संगीतबद्ध केल्यामुळं नोकरीवरून काढून टाकलं.
—————————
चार वर्षांपूर्वी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ABP माझा या मराठी वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्ट्या’वर दिलेल्या मुलाखतीत,’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘… सागरा प्राण तळमळला’ ही कविता ऑल इंडिया रेडिओवर संगीतबद्ध केल्यामुळं आपणास नोकरीवरून काढून टाकण्यात आलं,’ असं म्हटलं होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ही कविता खरंच आकाशवाणीसाठी संगीतबद्ध केली होती का किंवा ते आकाशवाणीत कामाला होते का, याची शहानिशा करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांत कुणीही केला नाही मात्र लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच धागा पकडून लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांवर काँग्रेसनं कसा अन्याय केला, हे राज्यसभेत बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले आणि ‘आपण कधी काळी आकाशवाणीत होतो,’ ही हृदयनाथ मंगेशकरांनी मारलेली थाप असल्याचं उघड झाल्यानंतर मोदी अक्षरशः तोंडावर पडले. चार वर्षांपूर्वी एकानं मारलेली थाप दुसऱ्यानं आणखी रंगवून सांगितली आणि या दोघांची ‘थापालॉजी’ साऱ्या जगानं ऐकली-पाहिली.
मंगेशकरांचं ते म्हणणं किती खरं किती खोटं..?
भाष्य १ : हृदयनाथ मंगेशकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलेला ‘तो’ किस्सा कसा खोटा होता, हे पटवून देण्यासाठी आता कैक जण पुढे सरसावलेत. आकाशवाणीच्या मुंबईसह विविध केंद्रांवर गेली साडे छत्तीस वर्षे काम केलेले कविवर्य डॉ. महेश केळुसकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. ‘माझ्या संपूर्ण कालावधीत पं. हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीत कामाला होते,’ असं मला कुणीही सांगितलेलं नाही. हृदयनाथ मंगेशकर यांचं सर्व्हिस रेकॉर्डही आकाशवाणीकडं उपलब्ध नाही, अशी आमची माहिती आहे. ‘…सागरा प्राण तळमळला’ ही सावरकरांची कविता संगीतबद्ध केल्यानं आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आलं या त्यांच्या म्हणण्याला काय आधार आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो. या त्यांच्या विधानाविषयी संशय निर्माण होणं साहजिक असल्यानं त्यांनी सांगितलेली माहिती मला काही खरी वाटत नाही. खरं तर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा…’ हे गाणं आकाशवाणीनं लोकप्रिय केलं आणि आजही त्याचं प्रसारण होतं. त्यामुळं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या विधानाचं स्वतः निराकरण करून हे संशयाचं वादळ शमवावं, अशी विनंती महेश केळुसकर यांनी केलीये.
भाष्य २ : मंगेशकर कुटुंबीयांशी जवळचा संबंध असलेले प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद सुरू झाल्यानंतर त्यांनी थेट हृदयनाथांशी संपर्क साधला. लतादीदींच्या निधनानं ते दुःखात असले तरी हा वाद मोठा असल्यामुळं वस्तुस्थिती समोर येणं आवश्यक होतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गाडगीळांना सांगितलं की, आपण कधीही आकाशवाणीच्या नोकरीत नव्हतो. 1957 साली मी आणि राजा बढे आम्हा दोघांचा गाण्यांना संगीत देण्यासाठी रेडिओशी करार झाला होता. ती तीन गाणी म्हणजे ‘चांदणे शिंपीत जाशी…’, ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या…’ आणि ‘कशी काळनागिणी…’ चौथ्या गाण्याच्यावेळी बोलणं झालं पण ते गाणं रेकॉर्ड झालं नाही. त्यांचा करार पुढं सुरू राहिला नाही.’ ते गाणं कोणतं हे मात्र हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलं नाही, असं गाडगीळ यांनी म्हटलंय.
भाष्य ३ : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनीही या प्रकरणावर भाष्य करत खरं काय ते लोकांसमोर यावं, अशी मागणी केलीये. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आकाशवाणीवर काम केल्याचा सांगितलेला कालावधी पाहाता त्यांच्या समकालीन एकाही व्यक्तीनं मंगेशकर आकाशवाणीत कामाला होते, याला दुजोरा दिलेला नाही. इतकंच काय तर त्या कालावधीत आकाशवाणीवर ज्या मराठी साहित्यिकांनी (पु.ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू वगैरे वगैरे) त्यांच्या आकाशवाणी काळातील आठवणी सांगितल्या त्यात हृदयनाथ मंगेशकर यांचा उल्लेख केल्याचा संदर्भ कुठंही आढळून येत नाही. त्यामुळं हृदयनाथ मंगेशकर यांनी आता स्वतः याबाबत खुलासा करावा आणि सत्य काय ते प्रकाशात आणावं अन्यथा एका थोर गायक, संगीतकाराला लोक उद्या थापाड्या म्हणतील आणि ते त्यांच्या चाहत्यांना ऐकणं जड जाईल.
एकानं मारलेली थाप दुसऱ्यानं मारलेल्या थापेतून उघड…
एकानं मारलेली थाप लोकांनी चार वर्षे पचवली, त्यावर खपलीही चढली पण दुसऱ्यानं हीच थाप पुढं रेटून त्यावरची ढलपी काढली. त्यामुळं कालौघात भरून निघालेली जखम आता पुन्हा एकदा ताजी झालीये. पं. हृदयनाथ आणि एकूणच मंगेशकर कुटुंबीयांवर अन्याय झाल्याची थाप मारत मोदींनी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं खरं पण त्यांनी मारलेली थाप ही इतर कुणी तरी मारलेली थाप होती, हे ओळखायला ते कमी पडले आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह स्वतःही थापाड्यांच्या पंक्तीत जाऊन बसले. मंगेशकर कुटुंबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कॉंग्रेसवर निशाणा साधत मोदींना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची होती हे समजलं पण पं. हृदयनाथ मंगेशकरांना ही अशी थाप मारून आणखी काय पदरात पाडून घ्यायचं होतं, हे काही समजलं नाही बुवा ! यालाच म्हणतात,’तुझ्या थापा नि माझ्या थापा, गुंफू थापांच्या थापा…’
-संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी