अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करून महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या तीन दिवसाच्या राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रात तांत्रिक बिघाड झाल्यास अडचणी येऊ शकतात. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसानंतर ही सुरू ठेवू अशी आक्रमक भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
महावितरणचे खाजगीकरण केले जाणार असून, अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. याबाबत राज्य सरकारची देखील सकारात्मक भूमिका असल्याने अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही प्रमुख मागणी आहे. याच प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार असून यामध्ये 30 संघटनांनी सहभाग घेतला आहे.