मुंबई : डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालची (Yashasvi Jaiswal) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Austrelia) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) जागी त्याला संधी देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड तीन जूनला विवाहबद्ध होणार असल्यामुळे भारतीय संघात हा बदल करण्यात आला आहे. भारतीय संघात ऋतुराज हा राखीव सलामीवीर होता. मात्र, विवाहामुळे आपण 5 जूनलाच संघात दाखल होणार असल्यामुळे बीसीसीआयने (BCCI) त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संधी आहे. यशस्वी जयस्वालकडे ब्रिटनचा व्हिसा असल्यामुळे तो येत्या काही दिवसांत संघात दाखल होईल.
यशस्वी जयस्वालची यंदाची आयपीएल मधील कामगिरी
यशस्वीने आयपीएलमध्ये 14 डावांत 625 धावा केल्या आहेत. त्याने या मोसमात एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. तो अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही; पण त्याने 15 प्रथम श्रेणी लढतींत 80.21 च्या सरासरीने 1 हजार 845 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने नऊ शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी WTC ची फायनल मॅच होणार आहे. ओव्हल मैदानावर (Oval Ground) हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTCच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी पहिल्या WTC फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून (New Zealand) पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्मा या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
WTC फायनल साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टिरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, ईशान किशन.
राखीव : यशस्वी जयस्वाल, मुकेशकुमार, सूर्यकुमार यादव.