नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट मॅच सुरु आहे. आर. अश्विनने (R Ashwin) कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंडिजच्या 5 फलंदाजांना आऊट करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सध्या सुरु असलेल्या सामन्यात टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. आर अश्विनच्या (R Ashwin) शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळले. अश्विनने 60 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. या कामगिरीसह आर अश्विनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
आर अश्विनने (R Ashwin) कसोटी क्रिकेटच्या एका डावात 5 पेक्षा जास्त बळी घेण्याची ही 33वी वेळ आहे. अश्विनने या कामगिरीसह इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा विक्रम मोडला आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटच्या एका डावात 32 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर अश्विन आता एका डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारा खेळाडू ठरला आहे.
वेस्ट इंडिजच्या भूमीवर तीनदा 5 बळी घेणारा अश्विन (R Ashwin) हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. अश्विनने आतापर्यंत 95 फलंदाजांना बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. याबरोबर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. यामध्ये कसोटीत 479, वनडेत 151 आणि टी-20 मध्ये 72 विकेट घेतल्या आहेत.