मुंबई : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Austrelia) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final 2023) अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटमधील एक नियम रद्द केला जाणार आहे. आयसीसीने (ICC) याबाबतचा निर्णय घेतला असून लवकरच हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यातून हद्दपार करण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्यापासून हा नियम रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना देण्यात आली आहे.
सॉफ्ट सिग्नल रूलमुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. त्यामुळे क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी हा प्रश्न उपस्थित करताना हा नियम रद्द करावा अशी मागणी केली होती. सॉफ्ट सिग्नल नियम रद्द केला पाहिजे आणि त्याचा निर्णय मैदानातल्या पंचांनी घ्यायला हवा अशी मागणी या दिग्गजांनी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्युशेनला सॉफ्ट सिग्नल म्हणून बाद देण्यात आले होते. तसेच सॉफ्ट सिग्नल नियमाचा इंग्लंडला गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फायदा झाला होता. यामुळे हा रुल प्रचंड वादग्रस्त ठरला होता.
काय आहे सॉफ्ट सिग्नल रूल?
थर्ड अंपायर जेव्हा एखाद्या विकेटबाबत अचूक निर्णय घेऊ शकत नाहीत तेव्हा सॉफ्ट सिग्नल म्हणून बाद दिलं जातं. एखादा झेल किंवा कोणताही कठीण निर्णय फिल्ड अंपायरकडून थर्ड अंपायरकडे पाठवण्यात येतो. तेव्हा सर्व तंत्रज्ञान वापरूनही टीव्ही अंपायरना याबाबत स्पष्ट निर्णय देता येत नसेल तर मैदानावरील पंचांचे मत घेतले जाते आणि तोच निर्णय कायम ठेवला जातो. आता हा नियम रद्द करण्यात येणार आहे.