मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळीच ईडीचे पथक हजर झालं असून पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे.
ज्या प्रकरणामुळे सध्या संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे, ते पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ?
पत्राचाळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात आता संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण अर्थात म्हाडाचा एक भूखंड होता. हा भूखंड विकसीत करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या मालकीच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला होता. ठरलेला कराराप्रमाणे संबंधित कंपनीला या जागेवर तीन हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 हे भाडकरूंना तर उर्वरित फ्लॅट हे म्हाडा आणि कंपनी यांनी वाटून घ्यायचे होते. मात्र या प्रकरणात प्रवीण राऊत यांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात याला आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची आज चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार कराराचे पालन न करता आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने या चाळीचा काही भाग हा खासगी बिल्डरांना विकला आहे. 2011, 2012 आणि 2013 मध्ये या भूखंडाचे अनेक भाग हे खासगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.
ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.