मानसिक आरोग्य : आयुष्यात बऱ्याच वेळा लहान-मोठी संकट येत असतात. बऱ्याच वेळा आपण परमेश्वराला दोष देत असतो, की हे संकट माझ्यासमोर का उभं केलंस आणि जेव्हा या संकटातून आपण बाहेर पडतो तेव्हा मात्र जाणवतं, की ते मुळात तेवढं मोठं नव्हतंच… ,एव्हाना या संकटाशी लढताना मिळालेला अनुभव आणि वाढलेला आत्मविश्वास हाच मोठा होता. त्यामुळे कधीही कोणतही संकट समोर आलं तर या तीन गोष्टी करायच्या आहेत. ज्यामुळे तुम्ही या संकटातून लवकर मोकळे व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास देखील कणखर राहील.
1. सूर्योदयानंतर सूर्यास्त आणि सूर्यास्तनंतर सूर्योदय हा निश्चित असतो. त्यामुळे आलेल संकट हे नक्की दूर होणार आहे. हे सर्वात पहिले स्वतःच्या मनाला सांगा आणि आलेल संकट हे किती मोठं आहे याचा विचार करत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. यातून तुम्ही वास्तवात जगण्यास सुरुवात कराल, त्यानंतर या संकटातून बाहेर पडण्यासाठी सेल्फ स्टडी करा. तुमचा वेळ, तुमचे शारीरिक आणि मानसिक श्रम हे वास्तवात त्या संकटाशी सामना करण्यासाठी फक्त खर्च करा.
2. संकट कोणतही असो आर्थिक, शारीरिक, मानसिक तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. अशावेळी कोणासमोर अश्रू अजिबात ढळू नका. मदत सुद्धा आत्मविश्वासाने मागा. बघा फरक जाणवेल ! समोरचा देखील तुम्हाला नक्की मदत करेल, कारण त्याचा परतावा तुम्ही त्या व्यक्तीला नक्की परत कराल हा विश्वास मदत करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यात दिसेल.
3. नियोजन करा…! तुमचा वेळ, बौद्धिक चातुर्य, जिभेवरचा गोडवा, डोक्यावरचा बर्फ, तुमचे शारीरिक श्रम ही पंचसूत्री आता तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे कधी कोणते सूत्र केव्हा वापरायचे हे ज्याला कळते तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो.
या तीन मार्गांनी तुम्ही तुमच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर नक्की पडू शकाल. पण लक्षात ठेवा कोणतही नातं असो रक्तांनी बांधलेलं किंवा मैत्रीचं नातं एखादं नातं भलेही टिकलं नाही तरीही सडेतोड संबंध खराब करणं बंद करा. जास्त वायफळ बडबड करणे, विनाकारण न मागता एखाद्याला सल्ले देणे बंद करा. एखाद्याच्या सुखात सामील होऊ शकले नाही तरीही चालेल, दुःखद नक्की सामील व्हा…! समक्ष भेटू नाही शकले तरी फोनवरून धीर नक्की देऊ शकता. लक्षात ठेवा कधी कोणतं नातं, कोणती ओळख, कोणती मैत्री तुमच्या संकटकाळात तुम्हाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाशी गरजेनुसार गोड रहा. स्वतःशी प्रामाणिक रहा आणि आत्मविश्वास ढळू देऊ नका.
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा