भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी प्रतिज्ञा आपण अभिमानानं करतो. ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी, क्रांतिवीरांनी ब्रिटिशांशी लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ज्या महान क्रांतिवीरांनी दिलेल्या बलिदानामुळंच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आज हे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना आपल्यात एवढा उत्साह आला असेल तर भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करतेवेळी संपूर्ण देशात किती उत्साहाचं वातावरण असेल ? पाहूयात… कसा होता भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन..
ती तारीख होती 15 ऑगस्ट आणि वर्ष होतं 1947… त्या दिवशी काय असतं स्वातंत्र्य हे अवघा भारत देश पहिल्यांदाच पाहणार होता. इंग्रजांच्या गुलामीतून आपण मुक्त होणार होतो. ही दृश्यं त्यावेळची आहेत ज्यावेळी स्वतंत्र भारताचा आनंद अनुभवण्यासाठी दिल्लीत तमाम भारतीयांनी एकच गर्दी केली होती. त्यादिवशी यत्र तत्र सर्वत्र आनंदीआनंद पसरला होता. ज्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे देखील माहीत नव्हतं ते देखील या आनंदात सहभागी झाले होते. एरवी बेल-बॉटम परिधान करून भारतीयांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या इंग्रजांचा रुबाब त्यादिवशी पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता घालून दिल्लीत दाखल झालेल्या भारतीयांसमोर गळून पडला होता.
इंडिया गेटपासून राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्यासाठी एखाद्या मुंगीलाही पाय ठेवायला जागा मिळणार नाही इतकी गर्दी त्यादिवशी उसळली होती. पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा कोणताही कार्यक्रम जाहीर केला गेला नसल्यानं उसळलेली गर्दी वाट फुटेल तिकडं सरकत होती. आपलं सरकार, आपली मातृभूमी काय असते याचा अनुभव घेत होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना खाकी वर्दीच्याही नाकीनऊ आले होते. तेव्हा तर लोकांना काही सेल्फी घ्यायचा नव्हता, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करायचा नव्हता की फेसबुकवर पोस्ट टाकून लाइक-कमेंट्सही मिळवायच्या नव्हत्या शिवाय तो ट्विटरचा जमानाही नव्हता. त्यावेळच्या भारतीयांचं कॅमेरा काय नि मोबाइल काय या दोन्हींशी दूरवरचाही संबंध नव्हता. तेव्हाची ती गर्दी फक्त स्वातंत्र्याच्या जल्लोषात दंग होती. याउलट, हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी इंग्रजांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश मात्र जागोजागी पडत होते आणि देश सोडून पळून जाता जाता आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिलं बरं का याचा पुरावा म्हणून त्यांच्या हातातल्या व्हिडिओ कॅमेऱ्यांचे डोळे गर्दीवरून गरागरा फिरत होते. जेव्हा काही दशकांनी इंग्रजांनी हा खजिना उघडला तेव्हा पहिल्या स्वातंत्र्यादिनाची ही रोमहर्षक छायाचित्रे सर्वांसमोर आली. पहिल्या स्वातंत्र्यादिनी केवळ इंडिया गेटच नव्हे तर संपूर्ण दिल्लीत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला होता आणि हीच ती छायाचित्रे जी त्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार ठरली होती. त्या शुक्रवारपूर्वी तो गुरुवारचा दिवस होता ज्यादिवशी संध्याकाळपासूनच भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याची जंगी तयारी सुरू झाली होती. स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी कुणी आपल्या घरादारासमोर रांगोळ्या काढत होतं तर कुणी नवीन कपड्यांच्या खरेदीत गुंग झालं होतं. गुरुवारचा सूर्यास्त होताच तिकडं दिल्लीत राष्ट्रपती भवन विद्युत रोषणाईत उजळून निघालं. राष्ट्रपती भवनाबाहेर प्रचंड गर्दी जमू लागली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ची ही रात्र भारताच्या पारतंत्र्याची शेवटची रात्र होती जी देशाला 15 ऑगस्ट 1947 च्या उगवत्या सूर्याचं दर्शन घडवण्यासाठी आसुसलेली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी सायंकाळी 5 वाजता भाररताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना प्रिन्सेज पार्कयेथे भारतीय तिरंगा फडकवायचा होता. त्याठिकाणी सुमारे 30 हजार भारतीय जमले असतील असा अंदाज त्यांच्या सल्लागारांनी काढला होता मात्र त्यांचा हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला. प्रिन्सेस पार्क येथे 5 लाखांचा जनसागर उसळल्याचं याचि देही याचि डोळा पाहिल्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांचेही डोळे फिरले. कुंभमेळा सोडल्यास भारताच्या इतिहासात एकाच ठिकाणी एवढी गर्दी झाल्याचं याआधी कधीही पाहायला मिळालं नव्हतं. माउंटबॅटन यांच्या बग्गीच्या भवताली इतकी गर्दी होती की बग्गीतून खाली उतरण्याचा विचारही त्यांनी केला नसावा. चोहोबाजूंनी उसळलेल्या या जनसागराच्या लाटांनी झेंड्याच्या खांबाशेजारी बनवण्यात आलेल्या त्या छोट्या व्यासपीठालाही धडका मारायला सुरुवात केली. गर्दीला रोखण्यासाठी व्यसपीठाशेजारी रोवण्यात आलेले बांबू, दोरखंड, बँडबाजावाल्यांसाठी टाकण्यात आलेलं व्यासपीठ देखील या लाटांनी धुवून काढलं. त्यादिवशी लोक एकमेकांच्या इतक्या जवळ बसले होते की त्यातून वाऱ्याला वाट काढणंही अवघड बनलं होतं. हेच ते प्रिन्सेस पार्क जिथं स्वतंत्र भारताचा तिरंगा मोठ्या डौलानं फडकला होता. याच प्रिन्सेस पार्कला आज राष्ट्रपती भवनाचं मुघल गार्डन म्हटलं जातं. चोहोबाजूंनी जमलेल्या गर्दीमुळं माउंटबॅटन आपल्या बग्गीतून उतरुच शकले नाहीत. त्यामुळं त्यांनी बग्गीतूनच ओरडत पंडित जवाहरलाला नेहरू यांना आवाज दिला,” बँडवाले या गर्दीत कुठं तरी हरवून गेले आहेत त्यामुळं आता तिरंगा फडकवा.” त्या गर्दीनं बँडवाल्यांना असं काही घेरलं होतं की बँडवाल्यांना बँड वाजवण्यासाठी आपले हात देखील हलवता येत नव्हते. सुदैवानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकांनी माउंटबॅटन यांचा आवाज ऐकला आणि तिकडं मोठ्या दिमाखात भारतीय तिरंगा उंच आभाळी फडकला. लाखो लोकांनी घेरलेल्या माउंटबॅटन यांनी आपल्या बग्गीवरच उभं राहून या भारतीय तिरंग्याला सॅल्युट केला. तिरंगा फडकू लागताच लोकांनी एकच जयजयकार सुरू केला… भारत माता की जय…
तर ही होती भारताच्या पहिल्यावहिल्या स्वातंत्र्यदिनाची रोमहर्षक कहाणी… आज आपण भारताचा 75 वा म्हणजे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम देशभर राबवत आहोत. भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय तिरंगा चिरायू होवो, ही सदिच्छा