आज हनुमान जयंतीनिमित्त सगळीकडे उत्साहाच वातावरण आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. यादिवशी हनुमानाला प्रिय असणाऱ्या शेंदूर, तेल आणि रुई या तीन गोष्टी अर्पण केल्या जातात. या तीन गोष्टी आवडण्यामागे काय कारण आहे जाणून घेऊ या.
दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल वाहतात. त्या संबंधी एक कथा आहे, की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तिमुळे लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडला होता. त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असताना गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले. परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्त्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच पोहोचला. यातूनच पुढे हनुमानाला तेल वाहण्याची प्रथा पडली.
हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम गणेशभक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी, इतकेच नव्हे, तर त्याला बळ, बुद्धी, नित्य लाभाव यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालत असे. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली.
हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे-सीतामाईला भाळी कुंकुम शेंदुर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि `माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय?’ असे हनुमंताने सीतामाईला विचारले.’ अस केल्यान तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल’ असे सीतामाईने हनुमानाला सांगितले, तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला.
हनुमानाला प्रिय असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे अशा अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. हनुमान जयंती हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नसून जगभरातील हिंदू समुदायही साजरा करतात. नेपाळ, मॉरिशस सारख्या देशांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी केली जाते.