नवी दिल्ली: भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला पूर्ण होत असून आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्यात लढत होणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत संसद भवनात पार पडणार आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान कसे होते?
घटनेच्या अनुच्छेद 66 मध्ये उपराष्ट्रपती निवडीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. ही निवडणूक आनुपातिक प्रातिनिधिक पद्धतीने केली जाते. एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे मतदान केले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर या निवडणुकीतील मतदाराला पसंतीक्रमाच्या आधारे मतदान करायचे आहे. उदाहरणार्थ, मतपत्रिकेवर उपस्थित असलेल्या उमेदवारांमध्ये, तो इतर उमेदवारांसमोर त्याची पहिली पसंती एक, दुसरी पसंती दोन असे लिहितो. ही संपूर्ण प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने केली जाते. मतदाराला आपली पसंती रोमन अंकांच्या स्वरूपात लिहायची आहे. हे लिहिण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या विशेष पेनचाही वापर करावा लागेल. या निवडणुकीत दोनच उमेदवार असल्याने विजयासाठी आवश्यक असलेली मते मतमोजणीच्या पहिल्या फेरीत एकाच उमेदवाराला जाणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही.
उपराष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या
उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात. राज्यघटनेत हीच त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते.
राष्ट्रपतीपद काही कारणाने रिक्त झालं तर त्यांना राष्ट्रपतिपदाच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. कारण राष्ट्रपतिपद रिक्त राहू शकत नाही.
पदांचा क्रम पाहिल्यास उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतिंपेक्षा कनिष्ठ आणि पंतप्रधानांपेक्षा वरिष्ठ असतात. शेजारी देशांशी संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने ते परराष्ट्र दौरेही करतात.