प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं एकदम सेम असतं. प्रेम म्हणजे एक भावना, म्हटल तर नातं… म्हटल तर नुसता शब्द..पण या दोन अक्षरी शब्दात दुसऱ्याला आपलंस करण्याची खूप ताकद आहे. पण या दोन अक्षरी शब्दाची सध्या भीती वाटत आहे..कुठलाही ओलावा, आपलेपणा या नात्यात राहिला नाही असच म्हणावसं वाटतय.. याचं कारण म्हणजे दर्शना पवार या आपल्यातल्याच सर्वसामान्य हुशार मुलीचा तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या मित्राने राहुलने केलेली तिची निर्घृण हत्या. या घटनेवरून असा प्रश्न पडतो की प्रेम खरच खून करतं का?
26 वर्षीय दर्शना पवार…सर्वसामान्य कुटुंबातील साधी, हुशार विद्यार्थिनी…शाळेत, कॉलेजमध्ये सुध्दा टॉपर, आदर्श विद्यार्थिनी.. घरच्यांचे कष्ट लक्षात घेऊन जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्यात तिसरी आली. फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिची निवड झाली.. काही दिवसातच तिच्या सगळ्या स्वप्नांना मूर्त स्वरूप येणार होतं…फॉरेस्ट ऑफिसर म्हणून ती रुजू होणार होती. पण ही सगळी स्वप्नं एका क्षणात संपली. ज्याच्यावर तिचा विश्वास होता, ज्याला ती लहानपणापासून ओळखत होती, ज्याच तिच्यावर प्रेम होतं त्या तिच्या जवळच्या मित्रानेच तिचा खून केला.
या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं…त्याचवेळी अनेक प्रश्न सुध्दा मनात निर्माण झाले.. खरच हल्ली आपल्या मित्रांवर विश्वास ठेवणं चूक आहे का? ज्यांना आपण मित्र मानतो ते विश्वास ठेवण्यासारखे नसतात का? या प्रकरणावर अनेक चर्चा झाल्या, अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. नेहमीप्रमाणे मुलगीच कशी चुकली हे सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. एकटी मुलगी मुलासोबत गेलीच कशाला असा प्रश्नही उपस्थित केला. अस म्हणताना त्या मुलाच्या वागण्याचं आपण समर्थन तर करत नाहीये ना? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कारण ज्याला आपण लहानपणापासून ओळखतो, जो आपला मित्र आहे तोच आपला जीव घेईल असा विचारही तिच्या मनाला शिवला नसेल.
गेल्या 4-5 वर्षांपासून राहुलही एमपीएससी ची तयारी करत होता..त्याला आलेलं अपयश… तिला पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं यश..तिने लग्नाला दिलेला नकार या सगळ्या रागातून त्याने तिची निर्घृण हत्या केली…
अनेकदा मुली एकतर्फी प्रेमाच्या बळी ठरतात.
कारण एका मुलीनं नाही म्हणणं हे आजही 21 व्या शतकात पुरुषी मानसिकतेला सहन होत नाही. पुरुषी अहंकार दुखावला जातो. आणि त्याच पुरुषी मानसिकतेची दर्शना ही बळी ठरली.
जवळचा मित्र समजणाऱ्या राहुल वर विश्वास ठेवून ती राजगडावर गेली हीच दर्शनाची चूक ठरली.
प्रेमात अपयश आलं म्हणून भावनेच्या भरात वाटेल त्या थराला जाणं, समोरच्याचा जीव घेणं म्हणजे प्रेम नाही.
दर्शना शिक्षणात टॉपर होती पण आपल्या आजूबाजूच्या लोकांचा स्वभाव ओळखण्यात मात्र ती कमी पडली. आज समाजात वावरताना खासकरून मुलींना माणसांची पारख करता येणं खूप गरजेचं आहे. कोणावरही विश्वास ठेवताना तो आंधळेपणाने नाही तर डोळसपणे ठेवला पाहिजे. माणसांची पारख करण्यात पण आपण टॉप असणं ही काळाची गरज आहे.
No means no… नाहीचा अर्थ नाहीच होतो हे पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे. नकार स्वीकारणं, तो पचवणं गरजेचं असतं. नाही म्हणण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. प्रेम प्रकरणात कायम मुलगीच चुकीची असते ही मानसिकता बदलणं आवश्यक आहे.. जोपर्यंत मुलीचा नकार स्वीकारून, तिच्या मताचा आदर करायला पुरुषी मानसिकता शिकत नाही तोपर्यंत अशा दर्शना बळी पडतच राहतील. पण या घटनेमुळे प्रेम खरच इतकं भयावह असतं का? हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. काही दिवसांनंतर दर्शनाला सगळे विसरूनही जातील, राहुलला शिक्षा ही होईल पण प्रेमाची हत्या करणाऱ्या राहुल रुपी विकृतीच काय? सांगण्याच तात्पर्य एवढच की मैत्री, प्रेम किंवा भावनिक नातं जोडताना जरा विचार करा.
(रिपोर्टर बागेश्री पारनेरकर)