आयुष्यात बऱ्याच वेळा आपण एकटे आहोत ,आपण काहीच करू शकत नाही का ? आपल्याहून लहान देखील आपल्यापेक्षा अधिक पैसा कमावतात ,माझा सातत्याने अपमान का होतो ? मीच का …? हा प्रश्न तर तुम्ही हमखास स्वतःला एखाद्या संकटात विचारला असेल… तर मग आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ,ज्यामुळे तुम्ही तुमचा गमावलेला आत्मविश्वास तर पुन्हा मिळेलच, पण पुन्हा तुमच्यावर कोणीही त्यांचे विचार लादू शकणार नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला ठामपणे दाखवून देणे जमायला लागेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुम्ही एकटे आहात ,तुमचं कोणीही नाहीये एखाद्या संकटातून तुम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणि असं बरंच काही तर एकदा एक संपूर्ण दिवस स्वतःला एकटं ठेवा. मग ती तुमची स्वतःची रूम असो ,एखादं मंदिर असो किंवा तुमची आवडती कोणतीही जागा… पण एक दिवस पूर्ण एकट राहा आणि आत्मपरीक्षण करा.
बऱ्याच वेळा तुमच्या अवतीभवती तुमचे खूप लोक असतात . रक्ताची नाती ,मित्रवर्ग पण तरीही तुम्हाला एकटं वाटतं. बऱ्याच वेळा आपण आपलं कर्तव्य करत असताना स्वतःला विसरून दुसऱ्याचा अधिक विचार करतो. त्यामुळेच तुम्हाला असं वाटू लागतं की तुम्ही एकटे आहात.
मला अमुक अमुक गोष्ट आवडत नाही, हे स्पष्ट म्हणायला शिका . मग ती व्यक्ती असो ,एखाद्या व्यक्तीने केलेली कृती असो, भाष्य असो ,वस्तु असो पण जर तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही तर स्पष्ट नाही म्हणायला शिका.
तुम्हाला काय म्हणायचे आहे हे मोजक्या आणि थेट शब्दात मांडायला शिका.
नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके राहायला शिकाच. आंघोळीचा कंटाळा, विस्कळीत कपडे असे स्वतःला प्रेझेंट करू नका त्यामुळे समोरचा तुम्हाला हलक्यात घेईल. नेहमी बाहेरच्या जगात वावरताना हमखास डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत टीप टॉप रहा.
वजन कमी-जास्त ,उंची कमी-जास्त, रंग गोरा-सावळा,केस विरळ-जाड ,डोळ्यांवर चष्मा या सगळ्या गोष्टी गौण आहेत. पण नेहमी लक्षात ठेवा ,या सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या तरीही वस्त्र, मेकअप, परिधान करत असताना ते आपल्या स्वतःच्या डोळ्यालाही चांगले वाटतात का ? याचा खरंच विचार करा.
तुमचा वेळ तुम्ही कधी कोणाला किती द्यायचा हे तुम्ही ठरवा. अर्थात कार्यालयाची वेळ जर नऊ ते सहा आहे तर ती संपूर्ण वेळ कार्यालयाला द्याच परंतु ,त्यानंतर तिथून बाहेर पडण्याचा हमखास प्रयत्न कराच. बाकीचा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खर्ची करा. हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अल्कोहोलिक पेक्षा वर्कोहोलिक माणसं अधिक आजारी पडतात.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूपच जास्त डिप्रेशन मध्ये आहात तर तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक तुम्ही ज्या परमेश्वराचं अस्तित्व काहीतरी आहे असे मानतात , त्या मंदिरामध्ये रोज काही वेळ जाऊन बसा . तुमच्या मध्ये नक्की सकारात्मक ऊर्जा भरून निघेल.
स्वतःची काम स्वतः करा आणि त्यानंतर दुसऱ्याला मदत करा . मग ती घरातली काम असो किंवा कार्यालयातील.
संवाद साधा, पुरुष असाल तरीही रडा, आवश्यक नसलेली नाती तोडून टाका, जवळच्या अत्यावश्यक तुटलेल्या नात्यांना समोर बसवून हितगुज करा. सर्वात महत्त्वाचे MOVE ON व्हा.