नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं (Chandrayaan 3) प्रक्षेपण करेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे ISRO पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-2 मध्ये विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी चांद्रयान – 3 च्या मोहिमेची (Chandrayaan 3) आखणी करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान – 3 विकसित करण्यात आले आहे.
कशी आहे चांद्रयान-3 ची मोहीम ?
प्रक्षेपण – चांद्रयान 3 आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपित होणार आहे.
2xS200 इग्निशन – रॉकेट इंजिन 0 सेकंदात प्रज्वलित होतील.
L110 इग्निशन – L110 इंजिन 108 सेकंदात प्रज्वलित होतील.
2xS200 पृथक्करण – दोन बाजूचे बूस्टर (2xS200) लॉन्च झाल्यानंतर 127 सेकंदानंतर वेगळे होतील.
PLF सेपरेशन – पेलोड फेअरिंग 195 सेकंदांनी वेगळं होईल.
L110 सेपरेशन – L110 इंजिन 306 सेकंदात वेगळं होतील.
C25 इग्निशन – C25 इंजिन 308 सेकंदात प्रज्वलित होतील.
C25 शट-ऑफ – C25 इंजिन 954 सेकंदांनी बंद होतील.
उपग्रह सेपरेशन – 969 सेकंदात उपग्रह रॉकेटपासून वेगळं होईल.
Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम
चंद्रापर्यंतचा प्रवास- प्रक्षेपणानंतर मॉड्यूल चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे एक महिना अंतराळात प्रवास करेल.
मून लँडिंग – इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. उशीर झाल्यास, इस्रो सप्टेंबरसाठी लँडिंगचं वेळापत्रक बनवू शकतं.
लँडर आणि रोव्हर मिशन लाइफ – लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी (14 पृथ्वी दिवस) काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.
काय आहे चांद्रयान -3 चं उद्दिष्ट?
चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं (Chandrayaan 3) प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच भारताच्या या चांद्र मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी देखील मदत होणार आहे. चांद्रयान -3 ची मोहिम यशस्वी झाल्यास चांद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे देश चंद्रावर जाण्यास यशस्वी ठरले आहेत.