चिपळूण : गेल्या चार वर्षांतील चित्रविचित्र राजकीय घडामोडी पाहता आणि रोज रोज तीच तीच भाषणं, टोमणे, रडगाणी ऐकून आता कान विटले आहेत. कोण काय बोलणार आहे हे आता इतकं पाठ झालं आहे की विसरायचं म्हटलं तरी विसरणार नाही. शाळेत कधी पाढे..कविता..सनावळ्या पाठ झाल्या नाहीत पण, गद्दार..खुद्दार.. कावळे…मावळे…खोके असं बरंच काही डोक्यात बसलय की पुढचे चार जन्म ते आठवत राहील…जेवढे गट होतील, तुकडे पडतील तेवढे नवीन वक्ते, काही वक्ते कम नकलाकार, अभिनय सम्राट तयार होतील. बाकी विधायक..सकारात्मक विचार दुर्मीळ झाले आहेत…व्हिजनसाठी नव्हे तर केवळ सत्तेसाठी सर्व खटाटोप आहे…आता खरं आणि स्पष्ट सांगायचे तर दसरा मेळाव्याना काडीचाही अर्थ राहिलेला नाही…आता त्यात ‘ आत्मा ‘ राहिलेला नाही…केवळ हजारो शरीरे नाईलाज म्हणून जातात…
बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता…उत्साह…चैतन्य..शान…साहेबांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी आसुसलेले कान…देशाच्या कानाकोपऱ्यात पोचणारे ठाकरी शब्दांचे बाण…सर्व काही आता इतिहासजमा झाले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून, सणाच्या दिवशी घरदार सोडून मुंबईत जायचं कशाला असा प्रश्न अनेकांना पडतो आहे, पण शक्तीप्रदर्शन महत्त्वाचे असल्याने ओढूनताणून गाड्याघोडी करून …खाण्यापिण्याची व्यवस्था करून हे सर्व केले जात आहे..यातून काही प्रमाणात काही बेरोजगार तरुणांची एकदोन दिवसाची सोय होत असेल फारतर…त्यानंतर पुढारी मजेत आणि हे मात्र फिरतात कामधंदा शोधीत…नाहीतर चकाट्या पिटत.
काही गोष्टी परंपरा म्हणून केल्या जातात…पण परिस्थितीनुरूप आणि वास्तवाची जाणीव ठेऊन त्या करायच्या की नाही करायच्या किंवा करायच्याच असतील तर त्यातून खरच काही समाज…राज्य…देश हिताची दिशा मिळणार आहे का, तशी कृती होणार आहे का याचा विचार केला गेला पाहिजे. आता प्रसारमाध्यमे मोठ्या संख्येने वाढली आहेत, सोशल मीडियाला तर काही अंतच राहिलेला नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जी उत्सुकता लागून रहाते ती आता दिवसरात्र दळण दळले जात असल्याने राहिलेली नाही. दिवाळीचा फराळ जोपर्यंत फक्त दिवाळीतच मिळायचा आणि तो कधी खातो असं व्हायचं तेव्हाची ओढ, आनंद आता वर्षभर कधीही काहीही मिळत असल्याने राहिलेला नाही. तसेच काहीसे या दसरा मेळाव्याचे झाले आहे. बरं त्यातल्या त्यात सर्व एक होते तेव्हा ठीक होते. आता एकाच घरात दोन दोन कुटुंब आपाआपला फराळ करतायत…कसं वाटतंय हे…त्यात कुटुंब, पक्ष तोडणारी टोळी सक्रिय झाल्यापासून तर काही बोलायची सोय राहिलेली नाही. 2024 मध्ये या चित्रविचित्र राजकारणाला एक नक्की दिशा मिळेल… जनता जनार्दन तेवढा व्यापक विचार करेल अशी अपेक्षा आहे.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.