फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावं महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची नगर परिषद होणार आहे.
त्याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उप सचिव अनिरूध्द व्यं. जेवळीकर यांनी आज काढले आहेत. फुरसुंगी आणि उरूळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे पालिकेतून वगळावीत व त्यांची स्वतंत्र नगरपालिका करावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्यता दिली.