पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र (Shiv Charitra) लिहिण्यासाठी लेखकांनी उपस्थित केलेला रॉयल्टीचा मुद्दा व राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असणार्या सिंदखेड राजा येथे गर्दी जमवण्यासाठी अभिनेत्रीला बोलवावे लागते. या दोन वेदनादायक घटनेतूनच महाराजांचा इतिहास लोकांपुढे आणण्याचे ठरवले. त्यातूनच शककर्ते शिवराय या ग्रंथाची निर्मिती झाली. असे विचार शिव कथाकार विजयराव देशमुख सद्गुरुदास यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शककर्ते शिवराय (पाचवी आवृत्ती), राजा शंभू छत्रपती (पाचवी आवृत्ती), सूर्यपुत्र (तिसरी आवृत्ती) या तीन ग्रंथाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड, मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त),संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंत गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयुचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे व छत्रपती सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अजय देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर हे ऑनलाइन उपस्थित होते.
विजयराव देशमुख म्हणाले 1974 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या बाबत घडलेल्या दोन घटनांनी मी व्यतीत झालो.त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवचरित्र लिहिण्याची जबाबदारी दत्तो वामन पोतदार यांना दिली. काही कारणास्तव ते पूर्ण झाले नाही. त्यानंतर वसंतराव नाईक यांनी विद्वानांना शिवचरित्र लिहिण्याची विनंती केली. मात्र रॉयल्टीच्या मुद्द्यावरून हा विषय रखडला. या वेदनेतूनच महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचे ठरविले.राज्य सरकारने 1974 मध्ये राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे 300 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्याची तयारी दर्शविली. पण गर्दी जमवण्यासाठी नर्गीस सारख्या अभिनेत्रीला बोलवावे लागले हा मनावर दुसरा मोठा आघात होता. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रात शिवदुर्ग यात्रा काढली.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, शिवचरित्रातून सद्गुण अंगी बाणवूया. त्याचे राजकारण करू नका. हर घर शिवचरित्र या संकल्पास आम्ही पूर्ण सहकार्य करू. हिंदवी स्वराज्याची भाषा ही कल्पनाच विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वरपूजा असते.आज आमचे छत्रपती सेवा प्रतिष्ठान सोबत हृदयाचे बंध निर्माण झाले आहेत.
पं.वसंतराव गाडगीळ म्हणाले,आज ही वास्तू या सोहळ्याने अधिक पवित्र झाली. डॉ. श्रीनिवास पाटील यांनी सांगितले की, माझे काही भाग्य योग असल्याने शिवनेरी, नागपूर, देहू, आळंदी, वडू तुळापूर येथे सेवा देता आली. मेजर जनरल (निवृत्त)शिशिर महाजन यांनी भारतीय सैन्य दले शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अभ्यास करतात हे चरित्र त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. डॉ. मिलिंद पांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.