पुणे (खराडी) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने होम मिनिस्टर आणि महिलांसाठी पारंपारिक लावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी लावणीच्या तालावर ठेका धरला. यावेळी सुमारे सातशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संयुक्त जयंती महोत्सव संयोजन समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सोमनाथ शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब सोनवणे, आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, अंकल सोनवणे, लेखिका सुभा लोंढे, सिमा गुट्टे, राजाभाऊ चौधरी आदी उपस्थित होते. सचिन बगाडे यांनी अ, ब, क, ड वर्गीकरणानुसार आरक्षण या विषयावर विचार व्यक्त केले. तर प्रा. सुहास नाईक यांनी अण्णाभाऊ साठे यांचे समाजवादी तत्वज्ञान या विषयावर व्याख्यान झाले.
प्रा. नाईक म्हणाले की, ”अण्णा भाऊ साठे हे फक्त मातंग समाजा पुरते सिमित नाहीत. मातंग समाजाच्या व्यतिरिक्त त्यांनी अनेक दलित समाजासाठी काम केले आहे. दलित समाजाचा आवाज त्यांनी उठवला आहे. ” आचार्ये अत्रे म्हणाले होते की, अण्णाभाऊ साठे यांच्या सारखे साहित्य हे मी गेल्या शंभर वर्षात लेखनामध्ये कुठे वाचले नाही. आता अशा प्रकारचे साहित्याचे कोणी लिखाण करेल, कोणी लिहील यावर मला शंका आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
बगाडे म्हणाले की, ”अनुसूचित जागेसाठी 13 टक्के आरक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ग केले आहे. आणि 13 टक्के आरक्षणासाठी महाराष्ट्रात 59 जाती आहेत. सामाजिक दृष्ट्या जागरूक आहेत तेच आजपर्यंत सुमारे 80% आरक्षणाचा फायदा घेत आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीचा आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी दिल्लीपर्यंत आम्ही धाव घेतली आहे. आतापर्यंतच्या व्यवस्थेने आमच्या समाजाचे शोषण केले. त्या व्यवस्थेला आजची सभा ही उत्तर आहे. लोकशाही व्यवस्थेत जो अस्तित्व दाखवतो, त्यालाच लोकशाही काही ना काही पदरात पाडून देते. ”
यावेळी 155 जणांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन अमोल अवचिते यांनी केले. लखन कांबळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. रघुनाथ कांबळे, सुनील खंडागळे, गोकूळ साठे, सोमनाथ कांबळे, कुमार कांबळे, खंडू खरात, श्रीराम शिंदे, अशोक साठे, सुरेश ढावरे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
वडगावशेरी, खराडी, येरवडा, वाघोली, खुळेवाडी, कोलवडी आदी परिसरातील मातंग समाजाला एका छताखाली आणणे. विचार विनिमय व्हावा. तसेच समाजात एकी निर्माण व्हावी, समाजावर अन्याय होत असल्यास त्याला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा. याउद्देशाने अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(सोमनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष)