पुणे : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत,, ढोल ताशांच्या गजरात आणि प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आरोग्यसाथी या पुस्तकाचे शानदार प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. आंबेगाव पठार येथील आपल्या चिंतामणी ज्ञानपीठाच्या भव्य प्रांगणात हा दिमाखदार सोहळा रंगला. आरोग्य सेवा, शासनाच्या विविध योजना आणि निरामय आरोग्यासाठी घ्यायची काळजी याविषयी पुण्यातील तज्ञ डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन या सगळ्यांचा समावेश असणाऱ्या आरोग्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन अजितदादांच्याच हस्ते व्हावे असा सर्वांचाच आग्रह होता. प्रचंड कार्यव्यस्तता असताना देखील अजितदादांनी वेळात वेळ काढला आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी भरपूर वेळ दिला.
यावेळी दीपकभाऊ मानकर, आमदार भीमराव तापकीर, दत्तात्रय धनकवडे, प्रदिप गारटकर, विजूशेठ जगताप, प्रदिप देशमुख, दिलीप बराटे, प्रकाश कदम, रमेश कोंडे, वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, युवराज बेलदरे, संतोष फरांदे, बाबा धुमाळ, युवराज रेणुसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा जिरेटोप, चांदीची गदा, शाल, ज्ञानेश्वरी, श्रीफळ देऊन अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्यसाथी पुस्तकाचे संपादन संकलन केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, डॉक्टर अशोक संचेती, डॉक्टर के आर चंदवानिया, गौतम गेलडा, डॉ. देविदास शेलार यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
पैशांपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सुदृढ, सशक्त आणि निरोगी समाज निर्मीती ही आज काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी संतुलित आहार घ्या,नियमित व्यायाम करा आणि व्यसना पासून दूर रहा आरोग्यसाठी हे पुस्तक समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी लिहिलेले लेखांमुळे आरोग्य विषयी सजगता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्यसाथी हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त असून ते गरजूंना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी केवळ आपले आशिर्वाद आमच्या सोबत असावे अशी अपेक्षा आप्पा रेणुसे यांनी प्रास्ताविकाद्वारे व्यक्त केली. रखडलेल्या डिपी रस्त्याबरोबरच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या आंबेगाव मधील कचरा प्रकल्प नागरी वस्ती बाहेर करावा अशीही आप्पा रेणुसे यांनी आग्रही मागणी केली, हे दोन्ही विषय ताबडतोब मार्गी लावण्याचे आश्वासन अजितदादांनी यावेळी दिले. नागरिकांच्या अलोट गर्दीने आणि उत्साहाने हा कार्यक्रम उत्तरोत्त रंगत गेला. संस्मरणीय असा दिमाखदार प्रकाशन सोहळा झाल्याचे भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. युवराज रेणुसे यांनी आभार मानले.