अन्न परवाना नूतनीकरण करण्यासाठी व्यावसायिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करावं, असं पत्र महापालिका आयुक्तांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पाठविले आहे.
शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परवाने दिले जात होते. असे परवाने देताना पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक होतं. महापालिकेकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मीटरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे व्यावसायिकांकडून पाणीपट्टी नियमित भरली जात असे. मात्र सध्या असे परवाने आणि त्याचं नूतनीकरण एफडीएकडून करण्यात येत असल्यामुळे व्यावसायिकांकडून महापालिकेची पाणीपट्टी थकबाकी ठेवली जात आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र पाठवून अन्न परवाना नूतनीकरण करण्यासाठी व्यावसायिकांना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करावे अशी मागणी केली आहे.