पुणे : आज पुण्यातील राजगुरूनगर या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची सभा सुरु आहे. या सभेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. मराठ्यांचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका, तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धारदेखील त्यांनी सभेदरम्यान केला.
नेमके काय म्हणाले जरांगे पाटील?
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सभा सुरू आहेत. आज त्यांची राजगुरूनगरमध्ये सभा आहे. या सभेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. तुमच्याकडे 24 तारखेपर्यंतचा वेळ आहे. आमचा संयम सुटू देऊ नका, मराठ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नका. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी या सभेमध्ये दिला.
यावेळी त्यांनी मराठ समाजाला कुणबीमधून आरक्षण नको म्हणणाऱ्यांना देखील टोला लगावला आहे. कोणालाही कुणबी प्रमाणपत्राची सक्ती नाही. ज्याला आरक्षण हवं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका असे आवाहनदेखील त्यांनी या सभेमधून मराठा समाजाला केले आहे.