पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल तयार होऊन जवळपास बारा वर्षे झाली आहेत. आता बारा वर्षानंतर उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावण्याचे शहाणपण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाला सुचले आहे. त्यामुळे महापालिका गेल्या बारा वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत होती का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
कोणताही उड्डाणपूल सुरू करताना त्याच्या सेफ्टी एनओसी संबंधित विभागाकडून घेण्यात येतात. भोसरी उड्डाणपुल सुरू करताना देखील सेफ्टी एनओसी घेण्यात आल्या असाव्यात. मात्र सफ्टी एनओसी घेतल्यानंतर बारा वर्षांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने उड्डाणपुलाला सुरक्षा कठडे लावले आहेत. त्यामुळे महापालिकेला बारा वर्षानंतर उशिरा शहाणपण सुचलं की काय ? अशी उपरोधक टीका होत आहे.
उड्डाणपुलाला खरंच सुरक्षा कठडे यांची आवश्यकता होती का ? का फक्त ठेकेदारांचे लाड पुरवण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलावर सुरक्षा कठडे लावले ? असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला आहे. तर महापालिकेच्या महापालिकेच्या स्थापत्य विभागाने या विषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. उड्डाणपुलाच्या क्रॅशगार्डची उंची कमी असल्याने आम्ही ती उंची वाढविण्यासाठी सुरक्षा कठडे वाढवून लावले आहेत अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.