पुणे : अजित पवार (Ajit Pawar ) यांनी महायुतीत प्रवेश केल्यामुळे लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा आणखी किचकट झाला आहे. काही जागांवर उमेदवार जाहीर झाले असले तरीही पारंपरिक विरोधक असलेल्यांना यंदा राजकारणातल्या बदललेल्या समीकरणांमुळे खांद्याला खांदा लावून एकमेकांचा प्रचार करावा लागणार आहे. या सगळ्यात सर्वाधिक नाराजीचा सूर हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आहे. राज्यातील सर्वात लक्षवेधी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ही असेच काहीसे नाराजी नाट्य रंगलेले आहे. कारण अजित पवारांचे पारंपारिक विरोधक असलेल्या राहुल कुल, कांचन कुल आणि हर्षवर्धन पाटील यांना अजित पवारांच्या उमेदवारांचा इच्छा नसतानाही प्रचार करावा लागणार आहे.
बारामतीतून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचे नाव निश्चित झाले तर त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर करण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. या जागेवर मागच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या उभ्या राहिल्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच बारामतीत कुल कुटुंबीय आणि पवार कुटुंबीयांचा संघर्ष जुनाच आहेत. त्यातच राहुल कुल आणि अजित पवार यांच्यात सारं काही अलबेल नाही. मात्र यंदा अजित पवारांच्या पत्नींचा प्रचार कुल यांना करावा लागणार असल्यामुळे त्यांची नाराजी आणखी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. या भेटीत फडणवीसांनी कुल दाम्पत्याची समजूत घातली.
दुसरीकडे काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील हे देखील अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. नुकतीच त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले दत्ता भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचा दोन वेळा पराभव केला. आता अजित पवार महायुतीत आल्यामुळे विधानसभेची ही जागा पुन्हा अजित पवार गटाला मिळेल त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पत्ता कट होऊ शकतो, हीच खदखद मनात घेऊन हर्षवर्धन पाटलांनी अनेक कार्यकर्त्यांसह फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत ‘युतीधर्म पाळावा व बारामतीची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत’, अशी समजूत फडणवीस यांनी काढली.
फडणवीस यांच्या भेटीनंतर राहुल कुल यांनी अजित पवारांबरोबर काम करावे लागेल याची नाराजी आहेच. मात्र ही नाराजी तात्पुरती असून पक्षाचा निर्णय अंतिम असेल व आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू, असे सांगितले. तर लोकसभेत तुम्ही अजित पवार गटाला मदत करा तर विधानसभेत अजित पवार तुम्हाला मदत करतील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्यामुळे हर्षवर्धन पाटील हे आता अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार करायला तयार झाले आहेत. दुसरीकडे अजित पवारांविरोधात बंडाच्या भूमिकेत असलेले विजय शिवतारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंच्या समजूतीनंतर बारामतीतून माघार घेतली आहे. त्यामुळे बारामतीतील नाराजी नाट्यावर आता कुठेतरी पडदा पडणार अशी चिन्ह दिसत आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम सुनेत्रा पवार यांच्या मताधिक्यावर होणार का हे येत्या काळात कळेल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.