सासवड- पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे ‘आप’चे बीज पुरंदरमध्ये उत्तम रूजू शकते असा विश्वास आपचे
जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला.
सासवड येथे झालेल्या ‘आप’च्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी सासवड आणि जेजुरी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किर्दत म्हणाले, ” महाविकासचे आघाडीचे नेते एकमेकांना गद्दार ठरवण्यात मग्न असून एकमेकावर चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीच देणघेणे उरलेले नाही. आप हा जनतेचा आवाज आहे व काम की राजनीती करणारा एक वेगाने वाढणारा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याची ओळख आता झाली आहे. महाविकास आघाडीमुळे पुरंदर तालुक्यासाठी आवाज उठवणारा विरोधी पक्ष उरला नाही. ज्यांच्या हातात सत्ता आली त्यांनी विमानतळ, राष्ट्रीय बाझार, गुंजवणी प्रकल्प यातले काहीच पुढे नेले नाही. पुरंदर तालुक्याने एकेकाळी जनता दल सारखा पर्याय सहज स्वीकारला होता, त्यामुळे आपचे बीज पुरंदर मध्ये उत्तम रूजू शकते” असे किर्दत म्हणाले.
‘आप’चे स्थानिक समन्वयक गणेश चौधरी म्हणाले की, दिल्लीनंतर पंजाब मधील विजयामुळे सामान्य जनतेच्या आशा जागृत झाल्या आहेत.
दत्तात्रय कड म्हणाले, स्थानिक पातळीवर पक्ष कार्यकर्ता मोहीम राबवण्यात येणार असून गावातही संपर्क मोहीम राबवण्यात येणार असल्याचे समन्वयक दत्तात्रय कड यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील इतर पक्षांतील दुसऱ्या फळीतील अनेक कार्यकर्ते आपच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.