पुणे शहरांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून शहराच्या अनेक भागांमध्ये रहिवाशांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. यासाठी एकेका गृहनिर्माण सोसायट्यांना अक्षरश: दर महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात पुरवणे ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठीच पुणे महानगरपालिका नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करत असते. असं असून देखील सध्या पुणे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना टँकर माफियांकडून चढ्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे महानगरपालिका सांगत आहे की, तब्बल 40 % पाणी गळती होत आहे. हे सरासर खोटे असून पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असून हे पाणी टॅंकर माफियांच्या माध्यमातून प्रचंड मोठा नफा कमवून बांधकाम व्यावसायिक, इंडस्ट्री यांना पुरवले जात आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याच्या विरोधात आज पुणे शहरातील शेकडो नागरिक व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते यांनी बालगंधर्व चौकांमध्ये जोरदार आंदोलन करून पाणी टंचाई व टॅंकर लॉबीचा निषेध व्यक्त केला. यावेळी “आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या” अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार, डॉ अभिजित मोरे, सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे, श्रीकांत आचार्य, मंजुषा नयन, प्रभाकर कोंढाळकर, किरण कद्रे, गणेश ढमाले, ज्योती ताकवले, वैशाली डोंगरे, आनंद अंकुश, किरण कांबळे व शेकडो कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
“पुणे महानगरपालिका नागरिकांकडून पाणीपट्टी पूर्णपणे वसूल करत असताना नागरिकांनी पुन्हा टँकरचे पैसे का द्यायचे ? हा प्रश्न आजच्या या आंदोलनामध्ये अनेक रहिवाशांनी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. महानगरपालिकेने आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्यावे आणि ते जर जमत नसेल तर टँकरचे पैसे द्यावे… टँकर विकत घेऊन पाणी पिणे हे आता नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. म्हणून ‘पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या’ अशी मागणी करत असल्याचं विजय कुंभार यांनी सांगितले.