पुणे : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घालून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवड समिती, नेते आणि कार्यकर्त्यांचा मान राखत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
एकीकडे हे सगळे घडत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम केले. मणिपूरमध्ये आदिवासींच्या दोन समुदायात एससी दर्जा मिळवण्यावरून हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सगळ्या हिंसाचारात मणिपूरमधील इंफाळ येथे शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील अडकले होते.
यादरम्यान “बाबा, हिंसाचार खूपच वाढलाय, सतत गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. कोणत्याही क्षणी माझ्या हॉस्टेलवरही हल्ला होऊ शकतो. कदाचित हे माझे शेवटचे बोलणे असेल”, अशा भयंकर संवादाचा फोन इंफाळ येथील एका विद्यार्थ्याने सांगलीतील जत तालुक्यात असणाऱ्या आवंडी गावात वडिल संभाजी कोडग यांना केला. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वडील संभाजी यांना मोठा धक्का बसला. यानंतर त्यांनी मुलाला सुखरूप वाचवण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मदत मागितली. यानंतर शरद पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. यानंतर तातडीने सूत्र हलण्यास सुरुवात झाली. यानंतर महाराष्ट्रातील दहा व इतर राज्यातील दोन असे बारा विद्यार्थी आय.आय.टी. (IIIT) इंफाळ,मनिपूर होस्टेलमधून आपल्या घरी सुखरूप परतले.