ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीचा प्रवास सध्या खडतर स्थितीत सुरू आहे. राज्यातील १६ हजार एसटी बसेसपैकी ७ हजार बसेसची स्थिती अत्यंत वाईट असून त्या प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य बनल्या आहेत. यामध्ये पुणे विभागाची काय स्थिती आहे. पाहूया
पुणे विभागातील ८५० बसेसपैकी ४०० बस प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक बनल्या आहेत. या बसेस राज्य परिवहन महामंडळाला भंगारात काढायच्या आहेत, मात्र त्या जागी दुसऱ्या बसची उपलब्धता नसल्याने त्यांच्या माध्यमातून वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आहे.एसटीच्या अपघाताचे प्रमाण जरी कमी असले तरीही ब्रेक डाऊनच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्याबरोबरच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील वाढत आहे. वर्षाकाठी ६० हजार एसटी बस ब्रेकडाऊन होत आहेत. एसटी बसची स्थिती खराब झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांचा वेळ वाया जाऊन गैरसोय देखील होते. डेपोतून निघताना या बसची कधी पाहणी होते, तर कधी नाही. या पार्श्वभुमीवर धोकादायक बसेस प्रवासी सेवेतून हटवणे गरजेचे आहे.