अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस… महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते ! पण एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपामुळं या दोघांच्याही पदांना मोठा हादरा बसला. सत्ताशिडीच्या खेळात अगदी वरपर्यंत गेलेल्या या दोघांना सत्तांतरसर्पानं एक पायरी खाली आणून ठेवलं…
……………………………….
दादांचं उपमुख्यमंत्रिपद फडणवीसांकडं; फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद दादांकडं
शिवसेना-भाजप युतीच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वोच्च पद भूषवलं तर मविआ सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन अजित पवारांनी
त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वोच्च पद भूषवलं. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणता म्हणता युतीचं सरकार गेलं, आघाडीचं सरकार आलं. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तर फडणवीस विरोधी पक्षनेता बनले. आज ना उद्या सरकार पडेल आणि माझी भविष्यवाणी खरी ठरत मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा माझ्याच गळ्यात पडेल, अशी आशा फडणवीसही बाळगून होते. तुमचा मुख्यमंत्री की आमचा मुख्यमंत्री या भाजप-शिवसेनेच्या रस्सीखेचात ‘मविआ’ सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री पद मिळालेल्या दादांचं आपलं मस्त चाललं होतं… पण अडीच वर्षांनी अचानक असं काही घडलं की राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी उलथापालथ झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. काल-परवापर्यंत उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना विरोधी बाकावर बसून विरोधी पक्षनेता बनावं लागलं तर एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं.
दादांचं उपमुख्यमंत्रिपद फडणवीसांकडं आणि फडणवीसांचं विरोधी पक्षनेतेपद दादांकडं; हे असं भलतंच काही तरी घडलं.
.……………………..
अजितदादा श्रीगोंद्यात आणि फडणवीस पुण्यात…
आपल्या राजकीय जीवनातील सर्वोच्च पदांनी हुलकावणी दिल्यानंतर कुणालाही त्याचं दुःख होणार हे साहजिकच आलं. मग या गोष्टीला हे दोघे तरी कसे अपवाद ठरणार ? शेवटी माणूस आहे; तो कुठं ना कुठं केव्हा ना केव्हातरी आपल्या मनातील खंत व्यक्त करणारच की ! अजितदादांनी ही खंत श्रीगोंद्यात व्यक्त केली तर फडणवीसांनी पुण्यात…
.…………………………
हो रे बाबा ! मी येतो मात्र विरोधी पक्षनेता म्हणू नको
श्रीगोंद्यातील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर एका कार्यकर्त्यानं दादांना, ‘तुम्ही उद्घाटनाला या,’ असं निमंत्रण दिलं. त्यावर दादा म्हणाले…
अजित पवार : हो रे बाबा ! मी येतो मात्र विरोधी पक्षनेता म्हणू नको. आता कधी काय होईल सांगता येत नाही. त्यांच्या मनात आलं आणि 20 लोक घेऊन गेले. आता सर्वत्र ‘ओके ओके’ सुरू आहे.
………………………
आधी मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री, उद्या आमदार झालो तर ?
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस भाषणास उभे राहिले आणि म्हणाले…
देवेंद्र फडणवीस : खरं म्हणजे मला मुख्यमंत्री असताना पुणे फेस्टिव्हलमध्ये बोलावलं होतं पण तेव्हा निघालो आणि पोचता पोचता उपमुख्यमंत्री झालो आणि आता मंत्र्याचा आमदार झालो तर कोण धोका पत्करेल ? म्हणून मंच सोडून जाण्यासाठी परवानगी घेतली बरं का !
…………………………
मनातली घुसमट वाढवत बसण्यापेक्षा ती व्यक्त होऊन बाहेर काढणं केव्हाही चांगलं, हाच संदेश या दोन दिग्गज नेत्यांना तर द्यायचा नसेल ना ?
संदीप चव्हाण
वृत्तसंपादक,TOP NEWS मराठी