मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले (Nana Patole) यांना पक्षांतर्गत विरोध वाढल्यानंतर त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसंच काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आपण गटनेतेपदावर राहण्यास इच्छुक नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळवले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष असून तो आता उघडपणे बाहेर येऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे पटोले यांची तक्रार केली होती. त्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. पटोले यांच्या जागी सर्वांना मान्य असेल आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नेते आणि पदाधिकाऱ्यांना जोडून ठेवू शकेल, असं नेतृत्व महाराष्ट्र काँग्रेसला देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरू आहेत.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी यांची नावे चर्चेत?
महाराष्ट्रात काँग्रेसचे विविध जिल्ह्यांमध्ये अनेक मातब्बर नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, सुनिल केदार, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र या सगळ्यात यशोमती ठाकूर यांचे नाव अधिक चर्चेत आहे.