सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे . सध्या राज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे आणि ते अमलात आणणे आवश्यक असताना नको त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा केली जात आहे . असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे .
दरम्यान सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , समाजवादी पार्टी आणि सर्व विरोधी पक्षांची बैठक पार पडली . अधिवेशनाचे कामकाज होत असताना आमचं स्पष्ट मत आहे की , ” ज्या प्रकारे सरकार सत्तेत आलं आहे . शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे . अजूनही हे सरकार विधी मान्य नाही अशी खोचक टीका देखील अजित पवार यांनी केली आहे .”
” अद्याप देखील सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला नाही, त्यामुळे हे अधिवेशन फार कमी काळाचा आहे. एकीकडे प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे . भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापन बंद पडले आहे . अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतकऱ्यांना जी काही मदत मिळणे अपेक्षित होते ती मिळालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाधानी नसून या कारणामुळे सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला ” असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्याचबरोबर ” आपण जय महाराष्ट्र म्हणतो , जय हिंद बोलतो , जय हरी बोलतो , आता वंदे मातरम मध्येच काय काढले ? वंदे मातरम म्हणायला विरोध नाही पण तुम्ही महागाईवर बोलत नाही . इंधन दर वाढीवर बोलत नाही . जीएसटी वाढीवर बोलत नाही . पण नको त्या विषयावर चर्चा करतात अशा शब्दात अजित पवार यांनी जोरदार हल्ला चढवला आहे .