मुंबई : भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून (BRS) ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष व तेलंगणा विधानसभेतील (BRS) सत्ताधारी पक्ष आहे. तेलंगणा हे आंध्र प्रदेशमधून फोडून वेगळे राज्य बनवण्यात यावे ही भूमिका घेऊन तेलुगू देशम पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव ह्यांनी 2001 साली तेलुगू देशममधून बाहेर पडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली. 2014 साली भारत सरकारने तेलंगणाला स्वतंत्र राज्य बनवण्याचा निर्णय घेतला व 2 जून 2014 रोजी नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात आले. 2014 लोकसभा निवडणुकांसोबतच घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने 119 पैकी 90 जागा जिंकून बहुमत मिळवले. के. चंद्रशेखर राव हे 2 जून 2014 रोजी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले. 5 ऑक्टोबर 2022 रोजी पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले.
तेलंगणा राज्यनिर्मितीपासून राज्याचे मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या के.चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय पातळीवरील राजकारणासाठी ‘भारत राष्ट्र समिती’ या नावाने नवा पक्ष स्थापन केला. आता त्यांचा हा पक्ष सध्या महाराष्ट्रात हात-पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात वर्चस्व असणारे बरेच नेते या पक्षाच्या गळाला लागले आहेत. महाराष्ट्रात, प्रामुख्याने मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर, नांदेड (कंधार-लोहा), परभणी या जिल्ह्यांत त्यांच्या सभांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 24 तास मोफत वीज-पाणी, लागवडीसाठी एकरी दहा हजार रुपये व अपघाती मृत्यू झाला, तर पाच लाख रुपये देण्याचे पंचसूत्री लोकांसमोर ठेवत ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षात दाळ न शिजू शकलेल्या नेत्यांना ते आपल्या पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
BRS कडून पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर; राज्यात मोठी उलथापालथ होणार?
‘अब की बार, किसान सरकार’ ही घोषणा देत केसीआर महाराष्ट्रात आपले नशीब आजमवताना दिसत आहेत. त्यांना तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी पुरेशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणे रंजक ठरणार आहे. ओवैसी बंधू आणि त्यांचा एमआयएम पक्ष जशी भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करत आलेली आहे, तशीच बीआरसने महाराष्ट्रात भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महाराष्ट्रात त्यांना मिळणारा प्रतिसादही संमिश्र स्वरूपाचा आहे. राज्यात विविध पक्षातील कार्यकर्ते मोठया प्रमाणात बीआरएसमध्ये सहभागी होत आहेत.त्यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद आणि विविध वाहिन्यांवरील जाहिराती, यांमुळे केसीआर यांच्या पक्षाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. निवडणुकीत असे असंतुष्ट नेते, कार्यकर्ते असणारा बीआरएस किती व कशी कामगिरी करेल हे येणाऱ्या काळात समजेलच.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपात कुठला मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येईल आणि आपली ताकद असूनही संधी नाकारली जातेय असं वाटणारे नेते ऐनवेळी या पक्षाच्या तिकिटावर नशीब आजमावतील, हे नक्की. अगदी अशीच शक्यता भाजप आणि शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबतही होणार आहे.
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केसीआर सध्या महाराष्ट्रात सभा घेत आहेत, त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर आहे. हा प्रतिसाद असाच कायम राहिला तर बीआरएसचे चार-दोन आमदार कदाचित महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहचतील. पण त्यांच्यामुळे बऱ्याच विद्यमान आणि भावी आमदारांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगणार आहे. ही शक्यता राज्यातल्या सगळ्याच प्रमुख पक्षनेत्यांनी गृहीत धरली आहे. बीआरएसला मिळणारा प्रतिसाद पाहून महाराष्ट्रातील नेत्यांनी याची धास्ती घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर बीआरएसला हलक्यात घेऊ नका असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
महाविकास आघाडी आणि भाजप-सेना युतीच्या थेट संघर्षात महाराष्ट्रात पाय रोवण्याची धडपड करणारी बीआरएस काही मते घेणार असेल, तर ती कोणाची घेणार? हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे बीआरएस महाराष्ट्रात नेमकी कोणाची ‘बी टीम’ बनतेय? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.