नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. निकालानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे.
संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. एनडीएकडून उमेदवार असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरु होईल. सर्व आमदार विधिमंडळात मतदान करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत 25 जुलैला संपत आहे. 21 जुलैला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए) माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. द्रौपदी मुर्मू या आधी झारखंडच्या राज्यपाल होत्या.
द्रौपदी मुर्मू यांचा पारडे जड असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. मुर्मू यांना विविध पक्षांना पाठिंबा मिळला आहे. मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, अण्णा द्रमुक, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अकाली दल, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, बसप, तेलुगू देसम या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मुर्मू यांचा विजय झाल्यास आदिवासी समाजाशी संबंधीत असलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती बनतील.