मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर प्रचंड गंभीर आरोप केले. त्यांच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांनी घेऊन प्रत्युत्तर दिले. राणेंच्या कार्यकाळात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईक यांचे खून कोणी केले हे आम्हाला बोलायला लावू नका. असा इशारा विनायक राऊत यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत उपस्थित होते. विनायक राऊत म्हणाले, “राणेंच्या कार्यकाळात सिंधुदूर्गात खून, मारहाण, दमदाटी धमक्यांचे प्रकार ९ वर्ष सुरू होते. दरम्यानच्या काळात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकूश राणे यांचे निर्घुन खून कोणी केले. श्रीधर नाईक यांच्या खुनात तर प्रत्यक्ष आरोपी कोण होतं. हे आम्हाला बोलायला लावू नका. या सर्व खुनांच्या मागे कोण होतं हे महाराष्ट्राला माहीत आहे”
“देवेंद्र फडणवीस यांनी तर विधीमंडळात राणेंच्या इतिहासाची कुंडली वाचली होती. त्यात ते म्हणतात की, रमेश गोवेकरांचं काय झालं ? अंकुश राणे यांचं काय झालं ? हे लक्षात घेतल्यावर पार्टी विथ क्रिमिनल कोण आहेत. हे लक्षात येतं”
“राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सिंधुदुर्गात झालेल्या खूनासंदर्भात पुन्हा तपास करुन त्यामागे कोण होते, याचा तपास करण्यासाठी भेटणार आहोत”, असं विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. “राणे कुटुंबाने मुंबईत अविघ्न सोसायटीमध्ये 300 कोटींचा घोटाळा केला”, असा खळबळजनक दावा केला.
एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने ईडीच्या नावाच्या धमक्या देणे हा केंद्रीय पदाचा दुरूपयोग आहे. हे बोलताना त्यांनी ईडीच्या कागदपत्रांची चोरी केलीये का? किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्याशी हातमिळवणी केली असेल. ईडी कशा सुपाऱ्या वाजवते. त्यांचे सुरू असलेले उपद्व्याप याबाबत आम्ही संसदेत आवाज उचलणार आहोत असे विनायक राऊत म्हणाले.
संजय राऊत यांचे ईडीला आव्हान
पुढील आठवड्यात ईडीच्या सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. ईडीच्या चौकशीची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचे किरीट सोमय्या सांगतात. लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहेत. आम्ही आरोप सुरु केले तर एक दिवस महाराष्ट्रातून तुम्हाला तोंड काळे करून जावे लागेल.