नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आज सरकारला घेरण्याची शक्यता असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
कोरोना मुळे मागील दोन वर्ष हिवाळी अधिवेशन नागपुरात न होता ते मुंबईमध्ये झालं होतं मात्र आता कोरोना नंतर जनजीवन पूर्वपदावर आलं असताना आता तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर हे अधिवेशन नागपुरात होत आहे.
विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पवित्रा स्पष्ट केला असून, शिंदे-फडणवीसांनीही विरोधकांच्या मुद्द्यांना उत्तर देत इरादे स्पष्ट केलेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे.