महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्याi सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, मुनाफ हकिम, जो. जो. थॉमस, श्रीरंग बरगे, राजाराम देशमुख, गजानन देसाई आदी उपस्थित होते.