नवी दिल्ली : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. देशभरातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीएविरोधात इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. यादरम्यान आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर 2024 मध्ये इंडिया आघाडी सत्तेत आली तर पंतप्रधान कोण होणार यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
काय म्हणाले शशी थरूर?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सत्ता मिळाली तर काँग्रेस राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढे करू शकते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी भाजपाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या एनडीएचा पराभव करेल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.