मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेची 42 मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा, ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असे राऊत म्हणाले.
राज्यात राज्यसभा निवडणुकीवर गोंधळ सुरु आहे. अशातच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संजय राऊतांना इशाराही देण्यात आला आहे. संभाजीराजेंच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्यानं विरोध करताना दिसत आहेत. 2024 ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं संजय राऊत यांना दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, ” याप्रकरणात संजय राऊतांचा व्यक्तीगत काय संबंध आहे? तसेच, शिवसेनेचा काय संबंध आहे? जे अशाप्रकारची वक्तव्य करतात त्यांनी या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? हे सांगा.”
“42 मतं संभाजीराजे छत्रपतींना देऊन राज्यसभेवर पाठवण्याचं उद्धव ठाकरेंनी नक्की केलं होतं. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी 15 दिवसांतल्या घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत”