संजय राऊत: डुकरं, रेडा, कुत्रे, नाल्याची घाण, मृतदेह, गद्दार, बेईमान आणि बरंच काही…
शिंदे गट: आम्ही सारे शिवसैनिक, आम्ही शिवसेनेतच !
…………………………..
‘सामना’ आणि ‘तोंडपट्टा’
शिंदे गटानं बंडखोरीचं हत्यार उपसल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत आपली लेखणी आणि वाणी ही दोन्ही शस्त्रं बेछूटपणे चालवत सुटलेत. ‘सामना’ आणि ‘तोंडपट्टा’ या शस्त्रांद्वारे बंडखोरांवर शाब्दिक हल्ला करण्याची एकही संधी ते सोडेना झालेत. 20 जूनच्या रात्रीपासून सुरू झालेले हे शाब्दिक हल्ले काही केल्या थांबेनात… पण इतके सारे हल्ले होऊनही शिंदे गट मात्र आम्ही सर्व शिवसैनिक असून आम्ही शिवसेनेतच आहोत, असं म्हणत राऊतांच्या हल्ल्यातील हवा काढून घेत आहेत.
………………………..
बिथरलेले संजय राऊत…
बंड झालं, निकाल लागला; रिक्षावाला मुख्यमंत्री बनला, शपथविधी होऊन राज्य कारभारही सुरू झाला पण शिवसेना त्यातल्या त्यात संजय राऊत अजूनही बिथरल्यासारखं वागतायत.
‘आता नवा संसार थाटलात ना; मग सुखानं नांदा’, असं एकीकडं म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र या नव्या संसारात नाक खुपसून नवदाम्पत्याला डिवचत बसायचं. रोज-दररोज ‘सामना’ तून टीकास्त्र सोडायचं आणि उरलासुरला सारा वेळ ‘तोंडपट्टा’ चालवत सुटायचं. ‘आम्ही ह्याव, आम्ही त्याव… तुम्ही रंक आम्हीच राव,” अशी शेखी मिरवत वाट्टेल तसं बरळत राहणं हे राऊत साहेब कधी थांबवणार ? एक ज्येष्ठ पत्रकार आणि विद्यमान राज्यसभा खासदार असलेल्या संजय राऊतांना कुठं थांबायचं हे कळत नाही म्हणजे कमालच म्हणायची ! संजय राऊतांचं हे म्हणजे,’आता उरलो टीकेपुरता,’ असंच काहीसं होऊन बसलंय.
……………………..
स्थिरावलेले एकनाथ शिंदे…
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी विधानसभा अधिवेशनात केलेल्या सहजसुंदर भाषणाचं सर्वत्र कौतुक झालं मात्र या कोडकौतुकानं हुरळून न जाता मुख्यमंत्र्यांनी एकामागोमाग एक असे जनहिताचे निर्णय घेत हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याची चुणूक दाखवून दिली. टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वेळ देणं महत्त्वाचं मानलं. ‘राजकीय बंडातून बनलेला मुख्यमंत्री’ अशी छबी पुसून टाकण्यासाठी त्यांनी उचललेली पावलं सध्या तरी योग्य मार्गावर पडतायत, असं म्हणायला हरकत नाही. शिंदेंची देहबोली आणि त्यांच्या कामाची स्टाइल पाहाता शिंदे आता कुठं तरी स्थिरावल्याचं चित्र दिसून येतंय.
…………………………..
संजय राऊतांनी आता तरी आपला हेकेखोरपणा सोडावा आणि शिंदे सरकारकडून होणाऱ्या राज्याच्या विकासकामास मदतीचा हात द्यावा नाहीतर राऊतांच्या या अति बोलण्याला कंटाळून उद्या महाराष्ट्राच्या जनतेनं म्हणू नये… शिंदे बनतायत नायक आणि राऊत ठरतायत खलनायक !
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी