मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मुंबई अध्यक्ष बदलण्यात आला असून त्या ठिकाणी राखी जाधव (Rakhee Jadhav) यांची वर्णी लागली आहे. या आधीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्याजागी राखी जाधव यांची वर्णी लागली आहे. नवाब मलिक वैद्यकीय जामिनावर असल्यामुळे शरद पवार गटाकडून ही नियुक्ती करण्यात आली. या आधी अजित पवार गटाकडून समीर भुजबळ यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नबाव मलिक यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा अतिरिक्त भार हा महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ कायम ठेवली. अखेर त्यांना याचे फळ मिळाले आहे. अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्या ऐवजी समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटाकडून देखील अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार गटाने आता राखी जाधव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
कोण आहेत राखी जाधव?
राखी जाधव या मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेत्या आहेत. राखी जाधव घाटकोपरमधून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या त्या जवळच्या मानल्या जातात.