अहमदनगर- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले. राज ठाकरे यांचे अहमदनगरमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. वाटेत पुण्याहून औरंगाबादला जाताना ठाकरे अहमदनगरमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी अहमदनगर बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबून जेवण घेतले.
मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे.
औरंगाबादकडे रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर १०० ते २०० पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. या पुरोहितांच्या आशीर्वाद घेऊन राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही नेते औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत.
अहमदनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. अहमदनगरमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर पुष्वृष्टी करण्यात आली. तसेच ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राज ठाकरे यांनी घेतले शाकाहारी जेवण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे तर त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होते. पुण्याहून औरंगाबादला जाताना ठाकरे अहमदनगरमध्ये थांबले होते. यावेळी त्यांनी अहमदनगर बायपास चौकातील एका शाकाहारी हॉटेलमध्ये थांबून जेवण घेतले. त्यावरून आता ठाकरे यांच्यातील बदलाची चर्चा सुरू झाली आहे.