मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह प्रहारचे आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे.
या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली.
उद्धव ठाकरे सरकारविरोधात त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी बंड पुकारलं आहे तसंच आम्ही पाठिंबा काढणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अन्य ज्येष्ठ आमदार उपस्थित आहेत.