अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून यावर आता दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “मी सांगतो ते महत्वाचे आहे. तुमच्या मनात असलेली चर्चा आमच्या मनात नाही. राष्ट्रवादीचे सर्व नेते पक्षाला मजबूत करुन समोर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या शिवाय कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. अजित पवार यांनी आमदारांची कोणतीही बैठक नाही. शंभर टक्के ही खोटी गोष्ट आहे. अजित पक्षाचे काम करत आहेत. ”
राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे बंडखोरी करून उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता, त्याच पद्धतीने अजित पवारही शरद पवारांना धक्का देतील, असे बोलले जात आहे, मात्र शरद पवार यांनी ही चर्चा फेटाळली आहे.