नाशिक- आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आणखी एक विधान पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण करू शकते. ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करून नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.
गेल्या काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.
पटोलो यांनी काहीच दिवसांपू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यानी “मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या भाषणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. भाजपने नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल करत पटोले यांनी आपल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
हा वाद शमायचा आधीच पटोले यांनी त्यात पुन्हा एक काडी टाकली. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते’ असं वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पटोलेविरुद्ध भाजप असे चित्र राज्याच्या राजकारणात दिसणार आहे.