मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यात उद्यापासून ‘मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत.
नाना पटोले यांनी सांगितले की,उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत. हातात फलक घेऊन ‘मोदी माफी मागो’ अशी मागणी करणार आंदोलन करण्यात येईल. तुम्ही पंतप्रधानांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचं समर्थन करणार असाल तर तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात, असाही पटोले यांनी म्हटले आहे.